पुरुषांनी रांडबाजी करणं म्हणजे छातीवर मेडल अडकवणं. मारूतीच्या दृष्टीने तोच खरा पुरुषार्थ. तसंही आता कुठं लढाया होताहेत?
मारूती मुलाला घेऊन एका इरानी हॉटेलात गेला. तिथे फॅमिली रूममध्ये एक बाई बसलेली. दगडू लहान असला तरी तो प्रकार त्याच्या लक्षात आला.
'असं करायचं होतं तर मला इथं आणलंच कशाला?' दगडू बापाशी भांडू लागला. ती बाई दगडूशी प्रेमाने बोलायचा प्रयत्न करत असताना दगडूचा बाप मात्र गालातल्या गालात हसत होता.
सखूला नवऱ्याचा बाहेरख्यालीपणा माहित होता पण तिची तक्रार नव्हती.
मारूती रोज दारू प्यायचा, पगार झाल्यावर पंधरा पंधरा दिवस घरी यायचा नाही आणि जिथे काम करायचा त्या गोदीमधून तांबे, पितळ चोरून चोरबाजारात विकायचा.
दगडूचा बाप वाईट होता असं नव्हतं. तो एक विद्रोही होता. त्याने कधी देवपूजा, उपास-तापास केले नाहीत. एकदा अंगात आलेल्या बाईच्या ढुंगात काटा टोचून त्याने तिचं 'वारं उतरवलं' होतं.
असा होता दगडूचा बाप.
मुंबईतील नागपाडाजवळील कावाखान्यात दगडूचं कुटुंब राहायचं. तो परिसर सभ्यतेचा बुरखा घातलेल्या पांढरपेशा लोकांचा नव्हता. 'जे आहे, ते आहे' असं स्पष्ट सांगणारा होता.
एका बाजूला वेश्यावस्ती तर दुसऱ्या बाजूला चोरबाजार. दोन्हीमध्ये होणाऱ्या गर्दीच्या रस्त्यातून पुढे गेल्यावर दगडूची वस्ती लागायची. कावाखान्याला लागून एक क्लब होता. मुंबईतले श्रीमंत लोक सकाळपासून रात्रीपर्यंत तिथे जुगार खेळत.
ही होती दगडूभोवतीची त्या वेळची सामाजिक परिस्थिती. दगडू कावाखान्यात राहिला असता तर बिघडला असता. सुदैवाने त्याच्या आईबापाने मुंबई सोडायचा निर्णय घेतला व ते त्यांच्या मूळ गावी परतले.
मुंबईत असताना दारू पिऊ-पिऊ मारुती खंगला होता. कधी दारू मिळाली नाही तर स्पिरिट पिऊन त्याने त्याची आतडीही जाळलेली. मुंबई सोडून अकोलेजवळील धामणगावात परतल्यावर त्याची दारू कमी झाली पण तोपर्यंत त्याचे दिवस भरले होते.
'सखू, तू दुसरा घरोबा कर.'
मारुती मेल्यावर सखूच्या माहेरच्यांनी तिला सल्ला दिला. असा सल्ला मिळायचं कारण होतं सखूूची आई. तिला मुलगा होत नसल्याने सखूच्या जन्मानंतर सासरच्यांनी तिचा अतोनात छळ केला व तिला दुसरा घरोबा करायला भाग पाडलं.
'तुझ्या आईने दुसरा घरोबा केला होता. तुला करायला काय झालंय?' माहेरचे लोक दुसऱ्या लग्नासाठी सखूच्या मागे लागले.
सात वर्षांची मुलगी आणि तिच्यापेेक्षा लहान दगडूसाठी सखूने दुसरा घरोबा करण्यास नकार दिला. तिच्या दृष्टीने मुलांचं भवितव्य महत्त्वाचं होतं.
'तुझा बाप तर मरुन गेलाय; मग तुझी आई पोटुशी कशी?' उमाआजाने दगडूच्या मनात विष कालवलं. कावाखान्यात नको नको त्या गोष्टी पाहिलेल्या दगडूने आईच्या चारित्र्यावरच संशय घेतला. आपला बाप जिवंत असतानाच आपली आईला गर्भ राहिला होता ही गोष्ट त्याला नंतर कळाली.
ज्या आईने बापाच्या बाहेरख्यालीपणाकडे दुर्लक्ष केलं, जिने आपल्या चिमण्या बाळांसाठी दुसरा घरोबा केला नाही, तिच्या चारित्र्यावर तिच्याच मुलाने संशय घेणं तिच्यासाठी वेदनादायी होतं. पण तिने हे हसून जिरवलं.
अशी होती दगडूची आई.
कावाखान्यात फारशी न जाणवलेली गोष्ट गावात स्पष्ट जाणवत होती; ती म्हणजे जातपात. ब्राह्मण, मराठा सोडूनच द्या अगदी कुंभार, चांभार, कोळ्याची पोरंसुध्दा दगडूला चार हात लांब बसवत.
शाळेत होणाऱ्या अशा भेदभावामुळे दगडूला शाळा नको वाटू लागली. मुंबईला जाऊन काहीतरी पोटापाण्याचा उद्योग करावा असे विचार डोक्यात येऊ लागले. त्याची द्विधा मनस्थिती झालेली.
मी या जगात 'नंगा आलो, नंगाच जाणार.' आयुष्यात वेगळं काही करायची गरज नाही हे मारुतीचं तत्वज्ञान तर आपल्या मुलाने शिकून कलेक्टर नाही तर कमीत कमी चांगला माणूस तरी बनावं हे सखूचं स्वप्न.
एखाद्याच्या वागणुकीवरून 'तो बापाच्या वळणावर गेलाय की आईच्या' हे ठरवलं जातं. दगडू कोणाच्या वळणावर जाणार हे काळच ठरवणार होता.
- विजय निंबाळकर, लोहगाव - पुणे
बलुतं हे पुस्तक बुकगंगा डॉट कॉम वरून २५% सवलतीत घरपोच मागवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा 8888 300 300 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा.